सोमवार, १५ जून, २०२०

#marriage story : काकांच, 'का...कू...' प्रेम, अजब प्रेमाची गजब कहाणी...


      नवरा माझं कौतुक करत नाही आणि त्याचं माझ्यावर प्रेमच नाही ही प्रत्येक स्त्रीची ही तक्रार असते. आपल्याला दिसतं आणि वाटतं तसं नसतं, हे बऱ्याचदा आपल्या लक्षातच येत नाही. अगदी नवविवाहितांपासून ते सत्तरी ओलांडलेल्या आजी-आजोबांपर्यंत प्रत्येक नवरा-बायकोच्या नात्यात एक वेगळं प्रेम असतंच. कधी ते व्यक्त केलं जातं, तर कधी न व्यक्त होताही. वर्ष जशी सरतात तशी त्या नात्याची वीण अधिक घट्ट होत जाते आणि प्रेमही अबोल होतं. मात्र तरीही नवरा कौतुक करत नाही हा पाढा मात्र कायम सुरूच असतो. 
    नवरा कौतुक करत नाही आणि त्यांचं प्रेमच नाही अशी सतत कुरकुर करणाऱ्या 70 वर्षांच्या काकूंवर काकांचं मात्र खूप जास्त प्रेम आहे. बऱ्याचदा काकूंना मात्र ते प्रत्यक्षात दिसत नसल्यानं किंवा काकांनी बोलून व्यक्त न केल्यानं गेल्या 40 वर्षांपासूनची काकूंची कुरकुर सुरू आहे. ही कुरकुर काका मात्र अगदी मिश्कीलपणे घेत तिच्यावर अपार प्रेम करतात. त्यांच्यातील या अबोल प्रेमाची ही छोटीशी कथा शब्दात मांडण्याचा प्रयत्न.
     काका तसे खूप शांत, अगदी मोजकं आणि कामापुरतं बोलणारे. काकू मात्र त्याच्या अगदी बरोबर उलट्या स्वभावाच्या. सतत बोलून व्यक्त व्हायचं जे मनात आहे ते सांगून मोकळं होणाऱ्या. नवरा आपलं कौतुक करत नाही आणि आपल्यावर प्रेम नाही कायमच ते फक्त कामापुरतं बोलतात. बाकी त्यांना काही पडलेलं नसतं काकूंची कायम तक्रार असते. रोज दोघांनीही संध्याकाळी 4.30 वाजता एकत्र बसून चहा प्यायची त्यांची नियमित सवय. काम करून जास्त दमल्यामुळे सहज त्यांना पडल्यापडल्या झोप लागली. काका मात्र चहाच्या वेळेनुसार उठले. पाहिलं तर शांत झोपल्या होत्या. त्यांना पाहून काकांनी हळूच पडदा ओढून घेतला. 
      मला खाली दूध आणायला जायचं होतं. मी काकांना सांगून दूध आणायला निघाले. त्यावेळी काका हळूच म्हणाले, 'बेल वाजवू नको हा! काकू झोपली आहे; दारावर टकटक कर, मी दार उघडेन.' मी फक्त हसून दूध आणायला निघून गेले. मी दूध घेऊन घरी आल्यावर दारावर टकटक केलं तर काका खरंच दाराजवळ उभे होते. त्यांनी शांतपणे दार उघडलं आणि निघून गेले. काकूंची झोपमोड होऊ नये म्हणून त्यांनी मला दाराची बेल वाजवू नको असं सांगितलं होतं. चहाची वेळ उलटून गेली असतानाही त्यांनी उठवलं नाही. काकांचं न बोलताही काकूंवर असणारं हे अबोल प्रेम त्यादिवशी मला जाणवलं आणि खूप अप्रूपही वाटलं. 
     दुसरा सांगण्यासारखा प्रसंग म्हणजे त्यांच्या लग्नाला एवढी वर्ष उलटून गेल्यानंतरही काकांना घरी कायम काकूंनी जेवण वाढायला हवं असा हट्ट असायचा. अन्नपूर्णा असलेल्या आपल्या बायकोने जेवण वाढल्याशिवाय गळ्याखाली काही घास उतरायचा नाही. जेवण तयार असेल आणि काकूंनी वाढलं नाही तर ते हातानी घेत नाहीत. काकूची वाट पाहतात किंवा दूध ब्रेड खातात. पण तिने जेवण आपल्या हातानं वाढून द्यावं हा हट्ट मात्र त्यांचा आजही कायम आहे.
    खरंच, आपल्याला बोलणाऱ्या किंवा व्यक्त होणाऱ्याच्या मनातील भावना, प्रेम दिसतं, कळतं, जाणवतं बोलून मोकळे होतात हे दिसतं. पण जे व्यक्त होत नाही त्यांना समजून घेणं आणि त्यांचे प्रेम कळणं फार कठीण आहे. काका प्रत्येक क्षणाला जरी प्रेम व्यक्त करत नसले तरी काकूंप्रती असलेली काळजी, जिव्हाळा आणि प्रेम हे कित्येकदा त्यांच्या कृतीतून दिसतं. खूप छोट्या गोष्टींचीही ते नकळत काळजी घेतात त्यात कुठेही दिखावा नसतो. 100 गिफ्ट, प्रेमाचे केवळ दोन शब्द आणि खोटी स्तुती करण्यापेक्षा त्यांनी अबोल पण चिरंतर असं हे प्रेम आपल्या मनात आणि कृतीत जपलं आहे. 40 वर्ष लग्नाला उटल्यानंतरही आज काकू कितीही कुरकुर करत असल्या तरीही ते कोणतीही तक्रार करत नाहीत. या उलट ते मिश्कीलपणे घेत तू बरोबर आहेस असं म्हणून तिचं मन राखण्याचा कायम प्रयत्न काका करतात.
क्रांती कानेटकर
-दिनांक- 15 मे 2020, मुंबई

रविवार, १४ जून, २०२०

संवाद संपला की वाद होतो? पण बोलायला खरंच वेळ आहे का? लॉकडाऊनमधला माझा अनुभव


प्रातिनिधिक फोटो

          काम करत असताना रविवारी (14 जून ) अचानक ट्वीट दिसलं. सुशांत सिंह राजपूतनं गळफास घेऊन आत्महत्या केली. एम. एस. धोनी हा मी पाहिलेला त्याचा चित्रपट. त्याच्या आत्महत्येबाबत आधी वाचून विश्वास बसेना, बातमी कन्फर्म आहे का हे पाहण्यासाठी इतर वेबसाईटवर शोधाशोध सुरू झाली आणि काही सेकंदात ही बातमी खरी ठरली. सगळ्यांनाच अचानक आलेल्या या बातमीनं मोठा धक्का बसला होता. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ, फोटो आणि कोट्स पुढच्या काही सेकंदात व्हायरल होऊ लागले. सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा होता सुशांतसोबत असं नेमकं काय घडलं असावं की त्याला आयुष्य संपवण्याची वेळ आली? दुसरं म्हणजे त्याचं मन मोकळं करायला खरंच हक्काची व्यक्ती नव्हती का की त्याला असा निर्णय घ्यावा लागला? य़ा प्रश्नांनंतर  सोशल मीडियावर अनेक पोस्ट फिरायला लागल्या आत्महत्या ही पळवाट आहे मनातल्या गोष्टी शेअर करायला हव्यात. बोलायला हवं... सगळं खरं असलं तरी माझ्या मनात आलेला सर्वात पहिला प्रश्न होता कुणाशी बोलायचं?
       स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण आपल्या व्यापात व्यस्त आहे. प्रत्येकाला या स्पर्धेत टिकायचं आणि जिंकायचं आहे. मोबाईल, टीव्ही, वेबसीरिज, ऑनलाइन खेळ आणि कामाचं शेड्युल या सगळ्यात हरवला आहे तो संवाद. हा संवाद कुणाशी आणि कसा साधायचा हाच मोठा प्रश्न आहे. ज्याला हे सगळं सांगावं ती व्यक्ती किती गोपनीयता बाळगेल? त्याचा गैरफायदा घेणार नाही ना? आपलं म्हणणं ऐकायला आणि समजायला त्याच्याकडे वेळ तरी आहे का? असे अनेक प्रश्न आजच्या या घटनेनंतर अधिक जास्त मला पडायला लागले.
हे प्रश्न पडण्याचं आणखीन एक कारण होतं ते म्हणजे लॉकडाऊनमध्ये माझं असलेलं एकटेपण. तुम्ही कितीही बतावण्या केल्यात तरी व्हर्च्युअल जगाचा एका लिमिटनंतर कंटाळा येतो. किमान मला तरी खूप त्रास व्हायला लागला. लॉकडाऊनच्या काळात आपल्या घरापासून कित्येक किलोमीटर लांब एकटं राहायचं, जिथे बोलायला आणि भेटायला लॉकडाऊनमध्ये कुणी येऊ शकतं नाही. प्रत्येक जण आपल्या व्यापात किंवा गॉसिप करण्यात व्यस्त असतो. कुणाला फोन करून बोलायची आणि वेळ मागायचीही चोरी झाल्यासारखं वाटलं मला.
       गमतीचा मुद्दा असा की लॉकडाऊनआधीही असे किती आणि कुठे कुणी बोलायचे कारण जो तो मोबाईल आणि आपल्या व्हर्च्युअल जगात किंवा कामात बिझी असायचा. यावरून मित्र-मैत्रीणींसोबत अनेक वादही झाले पण संवाद काही होऊ शकला नाही. प्रत्येकनं सुचवलं वेबसीरिज पाहा, वाच, लिही किंवा सिनेमा बघ काहीच नाही तर झोप काढ. पण हे त्या सगळ्यांसाठी फार सोपं होतं असं वाटायला लागलं होतं; कारण ते घरात कुटुंबात राहात असल्यानं त्यांच्या भोवती माणसं होती. सलग 3 महिने एका खोलीत मोबाईल, लॅपटॉप आणि तुम्ही एवढंच राहिलं तर एका वेळेनंतर जे फ्रस्ट्रेशन येईल तशी माझीही चिडचिड पहिल्या महिन्यात वाढायला लागली होती. सतत माणसात राहाणं आणि बोलण्याची सवय असल्यानं एकटं राहण्याचा हा अनुभव फार वेगळा आणि सुरुवातील खूप त्रासदायक होता. आता मात्र हळूहळू या वातावरणाची सवय व्हायला लागली. राहून राहून आता मलाच माणसं किंवा होणारा संवाद हा फक्त कामापुरता व्हावा असं वाटू लागेल अशी भीती मनात यायला लागली. काहींना ही नक्कीच नकारात्मकता वाटेल पण एका लिमिटनंतर डोकं भणभणायला लागतं हे पण तितकंच खरं आहे. 
     आपल्याला लहानपणापासून माणसात राहण्याची किंवा सतत कोणीतरी सोबत असण्याची एक सवय झालेली असल्यानं हा एकटेपणा खायला उठतो. कितीही व्हर्च्युअल जग मोठं आणि चांगलं वाटत असलं तरीही आपल्या माणसांसोबत होणारा संवाद हा त्यापेक्षा जास्त आनंद देणार असतो. गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या स्वार्थी वृत्ती आणि आत्मकेंद्रीपणामुळे नात्यातील संवाद संपून वादाची ठिणगी पडत असल्याचं पाहायला मिळालं. ब्रेकअप पासून ते घटस्फोटापर्यंतचं प्रमाण आणि लग्नानंतर केवळ नवऱ्याकडून प्रेम मिळत नाही म्हणून बाहेर होणारे प्रेम प्रसंग ह्या गोष्टींचं प्रमाण कुठेतरी वाढतंय असं ब्लॉग, बातम्यांमध्ये वाचनात आलं. नात्यातला वाद आणि वाढणारं अंतर यामुळे आपण जवळपास अर्ध मशीन झालोच आहोत. येत्या काळात पूर्ण मशीन होऊ अशी भीती वाटायला लागली आहे. यामधून वाढणारा आत्मकेंद्रीपणा, प्रॅक्टीकलच्या विचारांच्या नावे आपण करत असलेल्या कृतीनं नात्यातील संवादाचा गळा घोटत आहोतच पण वादाला मात्र जागा करून देत आहोत.
      मन हलकं करण्यासाठी, नात्यातील प्रेम वाढावं, प्रश्न सोडवण्यासाठी आणि सुटावेत म्हणून इथपासून ते अडीअडचणींना एकमेकांच्या पाठिशी उभं राहाता यावं म्हणून एकमेकांसोबत मनमोकळेपणानं संवाद साधायचा असतो. त्यातून घर, मित्र परिवार, आपली नाती तयार होतात. पण याच संवादाचा कुणीही गैरफायदा घेऊ नये किंवा गैरवापर करू नये ही एक धास्ती मनात असते. व्हर्च्युअल जगात ते ऐकायला कुणी नाही म्हणून कित्येकदा गोष्टी शेअर केल्या जात नाहीत. त्यामुळे सध्या तरी दोन गोष्टींची आतातरी गरज आहे असं मला वाटतं. जी आपल्या पातळीवर करता येईल. एकतर आपण इतकं एकटं राहायला शिकायला हवं की सगळं झेलायची ताकद हवी. आपल्याला कुणाचीही गरज पडणार नाही याची ठाम स्वत:च्या मनाला शाश्वती द्यायला हवी. थोडक्यात आपणच आरशासमोर आपलं शिल्पकार व्हायचं. दुसरं म्हणजे आपल्या सगळ्या कामातून म्हणजेच दिवसातल्या 24 तासांतून किमान काही मिनिटं महत्त्वाच्या नात्यांसाठी वेळ देणं आणि संवाद साधणं... नाहीतर शरीरानं नाही पण मनानं मात्र अनेकांना आत्महत्या करण्याची वेळ काही दूर नाही असं मला वाटतं...
- क्रांती कानेटकर
- दिनांक- 15 जून 2020, मुंबई