गुरुवार, २६ मार्च, २०२०

#21Days: कोरोनाने कुछ तो करना सिखा दिया, पण काळजी घ्या



कोरोना, चीन, भारत, जनता कर्फ्यू, लॉकडाउन, कोरोना रुग्ण हेच शब्द गेल्या काही दिवसांपासून कानावर पडत आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचा जगभर प्रादुर्भाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी रात्री संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आणि लोकं घरातच बंद झाली. अत्यावश्यक गोष्टी वगळता बाकी सर्व सेवा बंद राहणार असं सांगितलं. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. तसंच नागरिकांना सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. लॉकडाउन झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसांत आलेला अनुभव विसरता येणार नाही असाच आहे. प्रत्येकाला असे काही ना काही अनुभव आलेच असतील. कोणी प्रवास करताना अडकलं असेल. गाड्या मिळाल्या नसतील किंवा इतर अनेक अडचणी आल्या असतील.

माझाही अनुभव त्यापेक्षा काही वेगळा नाही. एका अशा शहरात जिथं एकटं राहताना सगळं बाहेरून घ्यावं लागतं. तिथं अचानक लॉकडाउन केलं जातं तेव्हा एकाच वेळी अनेक प्रश्न समोर उभे राहतात. ते प्रश्न सोडवताना जी काही तारांबळ उडते त्याचा अनुभव घेतला.  आपण सुरू केलेल्या डब्ब्याची सेवा बंद होते. जेवण स्वत: करून खाणं म्हणजे काय हे माहितीच नसल्यानं शिजवण्याचा प्रश्नच नसतो. त्यातच वर्क फ्रॉम होम ते सांभाळायचं असतं. आपल्या कामाच्या वेळेनंतर बाकीच्या गोष्टी करताना गोंधळ उडतो. आदल्या दिवशी आपल्याकडं काही असण्याचा तसा संबंध नाही. रोज लागेल ते थोडं घेऊन यायचं आणि वापरायचं असाच दिनक्रम. त्यामुळे लॉकडाउन झाल्यानंतर साहित्य आणायचं कुठुन असा प्रश्न. बरं बाहेर जावं तर सर्व दुकानं आधीच बंद झालेली असतात. त्यामुळे खाण्याचे पूर्ण वांदे आणि टीव्हीवर सांगितलं जात आहे किराणा मालाची दुकानं उघडी आहेत. बस फक्त चिडचिड होते. कारण आपल्याकडे शिल्लक नाही आणि खरेदी करायला काही सुरू नाही. काहीच नाही तर शोधू मिळालं तर ठीक नाही तर उपवास घडणारच म्हणून थोडं अंतर चालत शोधमोहिम सुरू केली. तेव्हा एक पेरूवाला आणि दूधाची डेअरी चालू उघडलेली दिसली.  दूध घेऊन रुमवर आले. त्यादिवशी दूध आणि पेरू एवढ्यावरच भागवावं लागलं. तो दिवस ढकलावाच लागला. काही पर्यायच नव्हता. सुदैवानं बिस्कीटं आणि मूग होते. बिस्किटं कॉफिसोबत खाल्ली आणि मूग भिजत घालून खाल्ले. पण हे किती पुरणार होतं. त्यातही उद्यासाठी काय मिळेल का याची शंका त्यामुळं थोडं शिल्लक ठेवावं लागलं. उद्या काय मिळेल आणि कसं याचा प्रश्न आ वासून समोर होता. कसाबसा पहिला दिवस गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठायला उशीर झाला होता. मोदींनी केलेल्या घोषणेनंतर सकाळी 8 ते 10 दुकानं उघडी राहणार होती. धावत पळतच बाहेर पडले. बाहेर आल्यानंतर पाकिट उघडलं तर तिथंही ठणठणाट. तर अडचणींना सुरुवात झालेली. आता त्यात एटीएम होतं पण पैसे काढायला लागणारं एटीएम मशिन बंद होती. जवळ असलेली 5 एटीएम मशिन पण त्यात खडखडाट. झालं आता आणखी एक पर्याय शोधा. एक समस्या सोडवताना दुसरी समस्या समोर तयार होती. नवीन भाग असल्यानं त्याबद्दलची माहितीही नव्हती. कुठे काय मिळेल हे शोधावं लागणार होतं. लॉकडाउनमुळे विचारायला रस्त्यावरही इकडं तिकडं कोणी नव्हतं. उशिर झालेला आणि 10 वाजायला काहीच मिनिटं होती. त्याच वेळेत एटीएममधून पैसे काढावे लागणार होते. कारण दुकानंही बंद होण्याची शक्यता होती. त्यानंतर संध्याकाळी उघडतील की नाही माहीत नाही. पुन्हा सामान संपलं तर काय? भीतीनेच पोटात गोळा आला.  जवळपास एक-दीड किलोमीटर चालल्यानंतर रांग लागलेलं एटीएम दिसलं. हुश्श म्हणत सुस्कारा सोडला. रांगेत उभी राहिले. सुदैवानं रांग लवकर संपली आणि थोडे ज्यादाचेच पैसे काढून मी आनंदान बाहेर पडले.

पैसे काढले आता त्या पैशातून जे साहित्य खरेदी करायचं होतं त्याचं दुकानं शोधण्याची वेळ होती. सगळं बंद असताना आणि पोटात कावळे ओरडत असताना स्वस्त आणि महाग हा विचार करण्यापेक्षा जे मिळेल जसं मिळेल ते घ्यावं लागत होतं.  दुकानदारही चढ्या भावानं विकत होते. माल येत नाही ताई घ्यायचं तर घ्या नाहीतर राहुदे अशा भाषेत सांगत होते. नाईलाज होता. शेवटी एका दुकानातून तांदूळ आणि मूगडाळ घेतली. बाकी काकडी, कांदा, टोमाटोसोबत इतर खायला घेतलं आणि निघाले. आयुष्यात पहिल्यांदा जेवण शिजवण्याचा प्रयत्न केला. आई-वडील सोबत नसताना फक्त मित्र-मैत्रिणी आणि ऑफिसरचे सहकाऱ्यांसोबत संपर्कात राहून फोनवरून विचारलं. आणि पहिल्यांदाच घाबरत इंडक्शनवर खिचडी केली. नशीबानं पहिलाच प्रयोग चांगला झाला.  हॉस्टेलवर राहिल्यानं याआधी कधीही जेवण करायची वेळ आली नव्हती. आज पहिल्यांदा ती वेळ आली.
अनेकांनी चिडवलं देखील या लॉकडाऊनमध्ये बघ जेवण शिकायची ही संधी आहे. म्हणजे लग्नानंतर तुला त्रास होणार नाही. पण लग्नासाठी नाही तर स्वत:ला जगण्यासाठी काही गोष्टी आल्याचं पाहिजेत हे मात्र खरं आहे. त्यातही पहिला प्रयोग यशस्वी झाल्यानं आता थोडा धीर आला. त्यामुळे असे प्रयोग  आता पुढचे 21 दिवस करायला हरकत नाही हा विचार आला. या लॉकडाऊनमुळे का होईना पण काय आणि कशा समस्या येतील हे समजलं. प्रत्येक छोट्या गोष्टीचा विचार आधीच करायला हवा. बॅकअप हवा आणि आईची आठवण झाली.
बाकी अशा अनेक गोष्टी आणि अडचणी येतील आणि उरलेल्या दिवसांमध्ये  आणखीही बरंच काही शिकायला मिळेल. तुम्हीही विनाकारण बाहेर जाऊ नका आणि गेलात तर मास्क घाला आल्यावर स्वच्छतेची काळजी घ्या. घरी रहाल तर सुरक्षित रहाल.

1 टिप्पणी: